मुंबई
Jasveer Kaur टेलिव्हिजन अभिनेत्री जसवीर कौर हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यात घडलेल्या काही धक्कादायक घटनांचा खुलासा केला आहे. ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत अनुपमाची मैत्रीण देविकाची भूमिका साकारून ओळख मिळवलेल्या जसवीरने तिच्यावर काळी जादू करण्यात आल्याचा दावा केला आहे. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
शुभोजीत घोष यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत बोलताना जसवीर कौर म्हणाली की, तिच्या आयुष्यात असा एक काळ होता, जेव्हा तिचे केस कापून जमिनीत पुरण्यात आले होते. “एकदा मी केस विंचरत असताना मला लक्षात आलं की केसांचा एक मोठा पॅच गायब आहे. हा छोटा भाग नव्हता, तर केसांची मोठी बट कापलेली होती. त्यानंतर एका महिलेनं माझ्या भावाला सांगितलं की तुझ्या बहिणीचे केस कापून जमिनीत पुरले आहेत. त्याला याबद्दल काहीच माहिती नव्हती, तरी तिनं असं सांगितलं. तेव्हा मला वाटलं की माझ्यावर काळी जादू करण्यात आली आहे,” असे ती म्हणाली.
या मुलाखतीत जसवीरने ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेतून अचानक काढून टाकल्याचाही खुलासा केला. दोन वर्षे या मालिकेत काम केल्यानंतर एका दिवशी अचानक तिला मालिकेतून वगळण्यात आल्याचे तिने सांगितले. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली आणि काही जणांनी तिला ट्रोलही केले.
या ट्रोलिंगनंतर जसवीर Jasveer Kaur कौरने स्पष्टीकरण देत सांगितले की तिच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. “मी पॉडकास्टमध्ये माझ्या आयुष्यातील अनुभवांबद्दल बोलले. जर संपूर्ण मुलाखत ऐकली तर लक्षात येईल की मी फक्त त्या काळात माझ्यासोबत जे घडलं तेच सांगितलं. माझं काम थांबलं होतं आणि मी खूप तणावात होते. मी दिवसरात्र रडत बसायची. त्या वेळी मला वाटत होतं की माझ्यावर काळी जादू करण्यात आली आहे,” असे तिने स्पष्ट केले.तिने पुढे सांगितले की, मालिकांमध्ये कधी कधी कलाकारांना अचानक काढून टाकले जाते. “कोणालातरी जागा देण्यासाठी अनेकदा कलाकारांना बाजूला केले जाते. मी आजवर कोणाबद्दलही चुकीचं बोलले नाही. हे ‘सीआयडी’बद्दल नाही, तर माझ्या आयुष्यातील त्या कठीण काळाबद्दल आहे,” असेही जसवीर कौरने नमूद केले.दरम्यान, जसवीर कौरच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील पडद्यामागील अनुभव आणि कलाकारांच्या वैयक्तिक संघर्षांबाबत चर्चा सुरू झाली आहे.