जमशेदपूर,
Death due to rasgulla झारखंडच्या जमशेदपूरमध्ये लग्न समारंभात एका दुःखद घटनेत ४१ वर्षीय ललित सिंग यांचा मृत्यू झाला. त्यांनी रसगुल्ला खाताना तो त्यांच्या श्वासनलिकेत अडकला. घटना सोमवारी सकाळी मलियांता गावातील एका लग्नात घडली. रसगुल्ला खाल्ल्यानंतर काही सेकंदातच ललित सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी घशातून रसगुल्ला काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते यशस्वी झाले नाही. कुटुंबीयांनी तातडीने ललित सिंग यांना एमजीएम रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांच्या मते, रसगुल्ला पूर्णपणे श्वासनलिकेत अडकला असल्याने त्यांच्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आणि काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला.

अन्न श्वासनलिकेत अडकण्याची प्रक्रिया गंभीर ठरू शकते. जेव्हा आपण खाण्यास बसतो, तेव्हा अन्न तोंड, घसा आणि पोटातून जात असते. सामान्यपणे, अन्न चुकीच्या दिशेने जाण्यापासून वाचवण्यासाठी श्वासनलिका तात्पुरती बंद होते. मात्र, अन्न नीट चघळले नसेल किंवा खूप वेगाने घेतले गेले असेल तर ते घशात अडकू शकते.श्वासनलिकेत अडकलेले अन्न लगेच ओळखणे आवश्यक आहे. लक्षणे अशी असू शकतात: अस्पष्ट बोलणे, श्वास घेण्यात त्रास, जलद किंवा विचित्र श्वास, खोकला, चेहरा लाल किंवा निळा होणे, गंभीर प्रकरणांमध्ये बेशुद्ध होणे.
अशा परिस्थितीत त्वरित मदत घेणे अत्यावश्यक आहे. प्रथम व्यक्तीला जोरात खोकला देण्यास सांगा. यामुळे अडकलेले अन्न बाहेर येऊ शकते. जर आराम मिळाला नाही, तर व्यक्तीला थोडे पुढे वाकवून पाठीवर पाच वेळा जोरात थाप द्या. स्थिती कायम राहिल्यास हेमलिच मॅन्युव्हर वापरावा. यामध्ये व्यक्तीच्या मागे उभे राहून वरच्या पोटावर दबाव दिला जातो, ज्यामुळे अडकलेले अन्न बाहेर येते.डॉक्टरांच्या मते, श्वासनलिकेत अडकलेले अन्न जीवघेण ठरू शकते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा व्यक्ती बोलू शकत नसेल, तर त्वरित वैद्यकीय मदत घेणे आणि आपत्कालीन सेवांना संपर्क करणे अत्यावश्यक आहे.