मुंबई,
naigaon-bdd-chawl : नायगाव बीडीडी चाळीतील ८६४ कुटुंबांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिल्या गेल्या. पूर्वी फक्त १६० चौ.फुटांच्या लहान खोलीत राहणाऱ्या रहिवाशांना आता ५०० चौ.फुटांचे आधुनिक २ बीएचके घर मिळाले आहे.
हा महत्त्वाकांक्षी पुनर्वसन प्रकल्प दोन टप्प्यांत राबविला जात असून, पहिल्या टप्प्यात ८६४ सदनिकांचे वितरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ५३७ सदनिकांचे बांधकाम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नव्या घरांमध्ये व्हिट्रीफाईड फरशा, ग्रॅनाइट स्वयंपाक ओटा, अॅल्युमिनियम खिडक्या, आग्निरोधक यंत्रणा, लिफ्ट्स, सीसीटीव्ही, बेसमेंट पार्किंग आणि भूकंपरोधक तंत्रज्ञान यांसारख्या आधुनिक सुविधा आहेत.
या प्रकल्पात शाळा, वेलफेअर सेंटर, मलनिस्सारण सुविधा, सौरऊर्जा प्रणाली आणि पर्जन्यजल संकलन यांसारख्या सोयीसुद्धा आहेत. सामायिक सुविधा पुढील १२ वर्षांसाठी म्हाडा कडून सांभाळल्या जातील, त्यामुळे रहिवाशांना देखभाल खर्चाचा त्रास होणार नाही.