सिरोंचा,
Sironcha-Alapalli गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा ते आलापल्ली दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग एन. एच. 353 सी. हा परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. या मार्गामुळे व्यापार, दळणवळण आणि आपत्कालीन सेवांना मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले या महामार्गाचे काम अद्याप पूर्णत्वास न पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
महामार्गाच्या कामाची सुरुवात होताच स्थानिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. दुर्गम भागाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास होता. परंतु, कालांतराने कामाची गती मंदावली आणि आजही अनेक ठिकाणी रस्ता अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येते.
या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, काही भागात डांबरीकरण पूर्णपणे उखडलेले आहे. काही ठिकाणी तर रस्ता बांधकाम अर्धवट सोडून दिल्याचे चित्र दिसून येते. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, प्रवास धोकादायक बनला आहे. दररोज शेकडो वाहनांची या मार्गावरून ये-जा असते. शेतकरी आपला माल बाजारात नेण्यासाठी, विद्यार्थी शिक्षणासाठी तर रुग्णवाहिका तातडीच्या सेवांसाठी या रस्त्यावर अवलंबून आहेत. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक वेळा वेळेत पोहोचणे कठीण होत आहे.
खराब रस्त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, काही ठिकाणी अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास थेट धोका निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे अपेक्षित असतानाही, ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.
स्थानिक नागरिकांच्या मते, कामात दर्जाहीन साहित्याचा वापर करण्यात आला असून, कामाची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे. त्यामुळे केलेले काम काही काळातच खराब होत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि विविध प्रसिद्धी माध्यमांनी या मुद्द्यावर सातत्याने आवाज उठवला आहे. हा प्रश्न जिल्हा व राज्य स्तरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, काही ठिकाणी वरिष्ठ अधिकार्यांचे लक्षही वेधण्यात आले आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी होऊनही संबंधित ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. ही बाब नागरिकांच्या संशयाला अधिक बळ देणारी ठरत आहे.
पाच वर्षांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण न होणे, तक्रारींनंतरही कारवाईचा अभाव आणि कामाचा खालावलेला दर्जा या सर्व बाबी पाहता नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.