नागपुरात पावसाला विराम; पण चंद्रपूर-गडचिरोलीत पावसाचा अंदाज

22 Mar 2026 10:27:33
नागपूर, 
vidarbha-weather नागपूरमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या हलक्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी पहाटे आणि दुपारी पावसाने हजेरी लावली, तर शनिवारीही काही भागांत हलक्या सरी कोसळल्या. सकाळपर्यंत अत्यल्प पावसाची नोंद झाली असून ढगाळ वातावरणामुळे तापमानातही घट जाणवली.
 
vidarbha-weather
 
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या शहरात मोठ्या पावसाचे संकेत नसले तरी काही दिवसांनी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गोंदियामध्येही हलक्या पावसाची नोंद झाली आहे. तापमानातही घट दिसून आली आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले, तर किमान तापमानातही किंचित घट झाली. पुढील काही दिवसांत मात्र तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. vidarbha-weather विशेषतः विदर्भात कमाल तापमानात काही अंशांनी वाढ होऊ शकते, तर किमान तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात अलीकडेच आलेल्या वादळ आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अनेक गावांमध्ये गारपिटीमुळे शेती पांढऱ्या थराने झाकल्यासारखी दिसत होती. हरभरा, गहू, भाजीपाला तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून संत्री, लिंबू आणि आंब्याची झाडेही मोठ्या प्रमाणात पडली. या आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांनी तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे. vidarbha-weather प्रशासनाने परिस्थितीची दखल घेत पाहणी सुरू केली असून महसूल आणि कृषी विभागाची पथके नुकसानीचा आढावा घेत आहेत.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेकडो शेतकरी या संकटामुळे प्रभावित झाले आहेत. काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे आणि बदलत्या हवामानामुळे शेतीवर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना उर्वरित पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नुकसान भरपाई लवकरच देण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0