कोलकाता,
Humayun Kabir-Owaisi alliance पश्चिम बंगालच्या राजकीय वातावरणात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी हालचाल दिसून येत आहे. आम जनता उन्नयन पक्षाचे प्रमुख हुमायून कबीर यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमसोबत युती जाहीर करत राज्यातील राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे. या घोषणेमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. हुमायून कबीर यांनी ओवैसी यांना आपले ‘मोठे भाऊ’ संबोधत या आघाडीला अधिक बळकटी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही युती केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून भविष्यातील राजकीय वाटचालीसाठीही महत्त्वाची ठरणार आहे.

या आघाडीच्या माध्यमातून राज्यभर सुमारे वीस सभा आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यातील पहिली सभा येत्या १ एप्रिल रोजी बहारामपूर येथे होणार आहे. या नव्या आघाडीमुळे हुमायून कबीर यांचा पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. त्यांनी या आघाडीला समाजातील दुर्लक्षित घटकांचा आवाज बनवण्याचा दावा केला आहे. तर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही या युतीमुळे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
या आघाडीमुळे ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षासमोर नवे आव्हान उभे राहू शकते. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतदारांचा मोठा भाग सध्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने झुकलेला मानला जातो, मात्र या नव्या राजकीय समीकरणामुळे त्या मतदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या युतीचा परिणाम निर्णायक ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.