कोलकाता,
Amit Shah criticizes Mamata Banerjee केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल सरकारविरोधात १४ आरोपपत्र दाखल केले आहेत. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवत ते म्हणाले की, हे सरकार नेहमीच स्वतःला पीडित दाखवते आणि निवडणूक आयोगाचा अपमान करणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे. अमित शाह यांनी उपरोधिक सांगितले की, देशात फक्त एकच राज्य आहे जिथे घुसखोरीला परवानगी दिली जाते. अमित शाह म्हणाले की, बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राजवटीत भीतीचे राजकारण, भ्रष्टाचार आणि भेदभाव प्रचंड प्रमाणात पसरले आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. त्यांनी आरोप केला की, टीएमसीने लोकांना ‘सोनार बांगला’चे स्वप्न दाखवले, पण प्रत्यक्षात सिंडिकेट राजवट स्थापन करून लोकांचे शोषण केले. त्यांच्या गैरकारभारामुळे बंगाल भ्रष्टाचाराची प्रयोगशाळा बनले आहे.शाह यांनी सांगितले की, बंगालच्या निवडणुकीत जनतेला भीती की विश्वास यापैकी एकाची निवड करावी लागेल. हे आरोपपत्र टीएमसी सरकारच्या १५ वर्षांच्या गैरकृत्यांचा संग्रह आहे.
निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेते सुवेंदू अधिकारी यांनी संपूर्ण बंगालचा दौरा केला आणि गोंधळ, अराजकता, आर्थिक संकट आणि घुसखोरीसारखे मुद्दे लोकांसमोर मांडले. अमित शाह म्हणाले की, बंगालच्या निवडणुका केवळ राज्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.शाह यांनी डबल-इंजिन सरकारच्या नेतृत्वाखालील इतर राज्यातील विकासाची उदाहरणे सांगितली. पूर्वी अविकसित असलेल्या उत्तर प्रदेशने अभूतपूर्व विकास पाहिला आहे, मध्य प्रदेशने प्रगतीचे नवीन मापदंड स्थापित केले आहेत, तर आसाममध्ये सेमीकंडक्टर कारखाना उभारला जात आहे. आता बंगालमध्ये याच विकासाचा मार्ग मोकळा व्हावा असे वक्तव्य त्यांनी केले आहे.