अयोध्या
Ayodhya Mahayagna fire अयोध्येतील माझा जमथरा परिसरातील सरयू नदीकाठावर सुरू असलेल्या श्री लक्ष्मी नारायण महायज्ञ दरम्यान शनिवारी दुपारी भीषण आग लागून संपूर्ण यज्ञस्थळाचा मोठा भाग जळून खाक झाला. या आगीत यज्ञासाठी उभारण्यात आलेले १२५१ हवनकुंड पूर्णतः नष्ट झाले. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, महायज्ञासाठी बांबू, बल्ल्या, काडीकचरा आणि कापडांच्या साहाय्याने मोठा व भव्य पंडाल उभारण्यात आला होता. शुक्रवारी मुख्य यज्ञाची सांगता झाल्यानंतर शनिवारी इतर धार्मिक विधी सुरू होते. दुपारच्या सुमारास अचानक पंडालमधून धुराचे लोट उठू लागले आणि काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले.
आग वेगाने पसरत गेल्याने Ayodhya Mahayagna fire उपस्थित भाविकांमध्ये चिंता पसरली आणि काही काळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले.घटनेची तीव्रता लक्षात घेऊन उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह, विभागीय आयुक्त राजेश कुमार, जिलाधिकारी निखिल टीकाराम फुंडे तसेच वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. गौरव ग्रोवर यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्याचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या.अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दमकल कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागूनही कोणतीही जीवितहानी न झाल्यामुळे प्रशासनाने दिलासा व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील कार्यक्रमांबाबत निर्णय प्रशासनाकडून घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे