आता पैसे मोजाअन् दु:ख सांगा!

28 Mar 2026 06:00:00
वेध
कालच्या वेदना सहन करीत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जिवाची ओढाताण म्हणजे आयुष्य होय. आज शंभरपैकी ९९ जण अशाच स्वरूपाचे जीवन जगत आहेत. परिणामी काही जण दु:खी झाले आहेत. अशा दु:खी लोकांना मन हलके करायचे आहे. त्यांना मनातले काही सांगण्यासाठी विश्वासू ऐकणारे आहेत. पण वर्तमानात तुमचे दु:ख ऐकून त्यावर फुंकर घालणारे शोधूनही सापडणार नाहीत. केवळ जखमांवर मीठ चोळणारेच सापडतील. अशा निष्ठूर जगात वावरणार्‍यांना दिलासा मिळावा म्हणूनच की काय मुंबईत Prithviraj Bohra पृथ्वीराज पूनमचंद बोहरा नावाच्या युवकाने ‘पैसे मोजा अन् दु:ख सांगा’ अशी पाटी लावत चौपाटीवर आगळेवेगळे दुकानच थाटले आहे.
 
 
bohara
 
राजस्थानात एखाद्या गावात श्रीमंत मरण पावल्यावर त्याच्या अन्त्यसंस्काराच्या वेळी पैसे देऊन रडणार्‍या स्त्रियांना बोलावतात. त्यांना ‘रुदाली’ असे म्हणतात. आज आपली सोडा, पैसे घेऊन रडणारी माणसं काही केल्या मिळत नाहीत. एवढी निष्ठूरता सर्वत्र दिसत असल्याने पृथ्वीराज पूनमचंद बोहरा या युवकाने दु:ख ऐकून घेत पोट भरण्याचा नवा व्यवसायच थाटणे थोडे हटकेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे बोहरा हेही राजस्थानी असून, पदवीधर आहेत. तत्त्वज्ञान विषयात पारंगत पृथ्वीराज विवाहित असून, त्यांना कोरोना काळात बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला. तेव्हा चारही बाजूंनी दु:खी, पीडितांचा भरणा होता. कुणीही कुणाचे ऐकून घ्यायला तयार नव्हता. आजही तीच परिस्थिती कायम आहे. म्हणूनच की काय प्रत्येक जण मनातून निराश झाला आहे. निराशा ही भयावह असते, असे पृथ्वीराज बोहरा मानतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार शंभरपैकी २५ लोक मानसिक आजाराने पीडित आहेत. या स्थितीत आपण काही तरी करायला हवे, असा विचार पृथ्वीराज बोहरा यांच्या मनात आला. त्यानंतर आपले दु:ख ऐकतो, तुम्ही पैसे मोजा, असा नवा फॉर्म्यूलाच पृथ्वीराजने व्यवसायातून समोर आणला. दु:ख ऐकणे हा व्यवसाय तरी यातून त्यांची समाजसेवाही महत्त्वपूर्ण मानायला हवी. ते केवळ दु:ख ऐकत नाही, तर पीडितांना मार्गदर्शन करून त्यांच्या आयुष्यात रंगतही आणतात. वाईट गोष्टीतूनही रोजगार निर्मिती होऊ शकते, हेही त्यांनी दाखवून दिले.
 
 
Prithviraj Bohra  जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर रंगत वाढत जाते. पण दुर्दैवाने आज कौटुंबिक संवाद संपलेला आहे. सर्व जण मोबाईलच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. रीलच्या चक्करमध्ये रीअल लाईफही लोक विसरले आहेत. आईला मुलांचे ऐकायला वेळ नाही. वडिलांची व्यथा ऐकण्याची मुला-मुलींची तयारी नाही. मित्रही रोज भेटतात पण संवाद न साधता घरी जातात. कार्यालयात आपल्या दु:खी सहकार्‍याला समजून घेण्याची इच्छा नाही. उलट ते त्याच्या चुका काढून खबरीलाल बनण्यातच धन्यता मानतात. या सर्व कारणांमुळे कुणाचे दु:ख उमगतच नाही. तसे पाहता आपल्या लोकांनी केलेली विचारपूस औषधालाही मागे टाकत असते. पण आज कुणीही कोणाची विचारपूस करीत नाही. लोक म्हणतात माणसाची सही आणि स्वभाव बदलत नाही. परंतु बोटाला जखम झाली तर सही मनाला जखम झाल्यावर स्वभावही बदलतो. असाच प्रकार समाजात वाढलेला आहे. याच कारणाने दु:ख जाणून घेणारे नामशेष होत आहेत. समजा एखाद्याने दु:ख जाणून घेतले तर तो त्यावर फुंकर घालण्यापेक्षा मीठ चोळून माणुसकीला काळिमा फासतो. परिणामी दु:खी, पीडित अधिकच संकटात सापडून निराश होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करतो. समजा आत्महत्या करण्याचे धाडस न मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, कॅन्सरसार‘या जीवघेण्या आजारांना बळी पडतो. वैद्यकीय उपचारांमुळे त्याची अर्थव्यवस्था डबघाईस जाते अन् तो जिवंतपणीच मरणयातना भोगतो. एवढे सर्व प्रकार मन हलके न झाल्याने होतात. पण समजा पृथ्वीराजने पैसे घेऊन का असेना कुणाचे दु:ख, वेदना समजून घेत त्यावर फुंकर घातल्यास नक्कीच त्याचे मन हलके होते. त्याच्यात जगण्याची वाढते अन् तो पुन्हा उठून धावायला लागतो. याला आपण सर्वांनी समाजसेवाच म्हणायला हवी. समजा आपल्या कृतीने कुणाच्या आयुष्यात आनंदाचे झाड लागत असेल तर नक्कीच ते सर्वांनी लावावे. एकंदरीत पाहता अश्रूंना वजन नसतं पण निघाल्यावर मन मात्र हलकं होऊन जातं. त्यानुसार आपण लोकांच्या चेहर्‍यावर हास्य आणले तर ती फार मोठी ठरते. येथूनच देशाच्या प्रगतीचाही आलेख उंचावेल.
- अनिल उमाकांत फेकरीकर
९८८१७१७८५९
Powered By Sangraha 9.0