जागतिक महिला दिन : आनंदाचा नव्हे तर आत्मचिंतनाचा

08 Mar 2026 15:54:11
संदीप नंदनवार
नागपूर,
Raulgaon SBL Energy explosion दरवर्षी महिला दिन हा स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. मात्र यावर्षी राऊळगाव आणि आसपासच्या गावांसाठी हा दिवस महिलांच्या बाबतीत अत्यंत दु:खद ठरला आहे. अनेक कुटुंबातील 'आई' आणि 'बहीण' या दुर्घटनेत गमावल्या गेल्याने परिसरातील गावागावांत शोककळा पसरली आहे. यावर्षीचा महिला दिन हा राऊळगावच्या घटनेमुळे आनंदाचा नसून आत्मचिंतनाचा आहे. महिलांचे सक्षमीकरण म्हणजे केवळ त्यांना नोकरी देणे नव्हे, तर त्यांना जिवंत राहण्याची शाश्वती देणे आहे, हाच संदेश या दुर्घटनेतून मिळतो. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर, कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेची किती भयानक स्थिती असू शकते, याचे हे दाहक वास्तव राऊळगावच्या स्फोटाने जगासमोर मांडले आहे.
 

Raulgaon SBL Energy explosion, Nagpur women worker deaths 
दरम्यान, आज ८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनापूर्वीच १ मार्च २०२६ रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल एनर्जी' कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या भीषण स्फोटात आतापर्यंत बळींची संख्या २० झाली असून १५ हून अधिक महिलांचा यात मृत्यू झाला आहे. या सर्व महिला प्रामुख्याने स्फोटकांच्या पॅकिंग विभागात कार्यरत होत्या. या महिलांना दररोज कंपनीच्या बसने किंवा खाजगी वाहनाने आसपासच्या गावांतून कामावर यावे लागत असे. दुर्दैवाने, केवळ कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या जिद्दीपोटी या महिलांना आपला जीव गमवावा लागला.
विशेष म्हणजे, या कंपनीत Raulgaon SBL Energy explosion काम करणाऱ्या बहुतांश महिला गरीब कुटुंबातील असून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या तेथे कार्यरत होत्या. कामाचे तास १२ वरून ८ केल्यामुळे अनेक महिलांनी या कामाला पसंती दिली होती, परंतु सुरक्षा नियमांच्या अभावामुळे हा निर्णय त्यांच्या जीवावर बेतला. यामुळे स्फोटकांच्या कंपनीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. प्राथमिक तपासात कंपनीच्या वतीने सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या मनातील विचार
 
 
१. महिला सुरक्षा ही केवळ घोषणा नको, तर वास्तव हवे
 
 
महिला दिनाच्या दिवशी अनेक ठिकाणी महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी केल्या जातात. मात्र, राऊळगावच्या घटनेने हे दाखवून दिले आहे की, अनेक महिला आजही अशा अत्यंत धोकादायक ठिकाणी काम करत आहेत जिथे सुरक्षेचे साधे नियमही पाळले जात नाहीत. आम्हाला फुलांचे गुच्छ नकोत, तर कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण द्या," हाच मुख्य सूर महिलांमध्ये आहे.
 
२. आर्थिक मजबुरी आणि जिवाचा धोका
 
 
या कंपनीत काम करणाऱ्या बहुतांश महिला गरिबीमुळे आणि कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी तेथे जात होत्या. महिला दिनानिमित्त महिलांचे असे मत आहे की, ग्रामीण भागातील महिलांना केवळ 'मजूर' म्हणून न पाहता त्यांच्या जीविताचे रक्षण करणे ही सरकार आणि उद्योजकांची प्राथमिक जबाबदारी असावी.
 
 
३. 'ती'च्या कष्टाचा सन्मान आणि न्याय
 
 
राऊळगावच्या स्फोटात अनेक तरुण मातांनी आपला जीव गमावला, ज्यामुळे अनेक मुले पोरकी झाली आहेत. या महिला दिनी पीडित कुटुंबांना केवळ मदत नको, तर जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे .
 
 
४. कुटुंबासाठी दिलेले बलिदान
 
 
या दुर्घटनेत बळी पडलेल्या महिला त्यांच्या घराचा मुख्य आधार होत्या. महिला दिनी हा संदेश दिला जात आहे की, स्त्री केवळ घराची लक्ष्मीच नाही, तर ती घरासाठी आपला जीव धोक्यात घालणारी योद्धा देखील आहे. तिच्या या बलिदानाची जाणीव ठेवून उद्योगांनी सुरक्षेचे 'ऑडिट' करणे अनिवार्य आहे.
 
 
त्यांना या कंपनीत काम करावे लागण्याची मुख्य कारणे
१. कुटुंबाचा उदरनिर्वाह : यातील अनेक महिला त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्ती होत्या. नावाच्या एका पीडित महिलेचे पती अपघातामुळे चालू शकत नव्हते, त्यामुळे सासू-सासरे, पती आणि २ वर्षांच्या मुलीची जबाबदारी तिच्यावर होती
 
 
२. आर्थिक अडचण आणि शिक्षण : काही महिला उच्चशिक्षित असूनही, योग्य पगार असलेल्या नोकरीच्या अभावामुळे आणि घरच्या कर्जासाठी किंवा उपचारांच्या पैशांसाठी त्यांनी या कंपनीत काम स्वीकारले होते.
 
 
३. बदललेले कामाचे तास : कंपनीने पूर्वीचे १२ तासांचे शिफ्ट बदलून ८ तास केल्यामुळे, घर सांभाळून काम करणे शक्य होईल या आशेने अनेक ग्रामीण महिला या कामाकडे वळल्या होत्या.
 
 
४. शेतीचा अभाव : अनेक पीडित महिला भूमिहीन कुटुंबातील होत्या. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांनी अशा स्फोटकांच्या कारखान्यात जीव धोक्यात घालून काम करणे पसंत केले.
 
 
५. पगाराचे आकर्षण : या कंपनीत महिलांना दरमहा सुमारे १०,००० ते १३,००० रुपये पगार दिला जात होता . ग्रामीण भागात रोजगाराच्या इतर संधी कमी असल्याने या पगारासाठी त्यांनी ही धोकादायक नोकरी पत्करली होती
Powered By Sangraha 9.0