सांगली
Pomegranate export आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाचा परिणाम आता महाराष्ट्रातील फळबागायतदारांवरही होऊ लागला आहे. विशेषतः सांगली जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. आखाती देशांकडे होणारी डाळिंबाची निर्यात सध्या पूर्णपणे ठप्प झाली असून निर्यातीसाठी तयार ठेवलेले मोठ्या प्रमाणातील फळसाठे अडकून पडले आहेत.
मुंबईजवळील जेएनपीटी बंदरावर सध्या सुमारे १५० ते २०० कंटेनर डाळिंब निर्यातीच्या प्रतीक्षेत थांबलेले आहेत. युद्धामुळे आखाती देशांतील बाजारपेठा आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने निर्यात थांबली आहे. त्यामुळे सांगलीसह नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातून निर्यातीसाठी पाठवलेले डाळिंब आता पुन्हा स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जात आहे.यामुळे बाजारात डाळिंबाचा पुरवठा अचानक वाढला असून दरात मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रतिकिलो सुमारे ३०० रुपये दराने विकले जाणारे डाळिंब Pomegranate export आता १५० रुपयांपर्यंत खाली आले आहे. या दरकपातीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.डाळिंब निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या सांगली, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहेत. युद्धस्थिती लवकर निवळून निर्यात पुन्हा सुरू व्हावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. तसेच सरकारनेही या परिस्थितीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बागायतदारांकडून होत आहे.