बुलढाणा,
Sambhaji Maharaj Jayanti धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव यंदा अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध स्वरूपात साजरा करण्यात येणार असून १२ मे पासून महानाट्याच्या माध्यमातून या उत्सवाची सुरुवात होईल, अशी माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली. बुलढाण्यात २२ एप्रिल रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन बैठकीत आगामी जयंती उत्सवाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
१४ मे रोजी होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शहरासह मतदारसंघात शोभायात्रा, व्याख्यानमाला, सांस्कृतिक सादरीकरणे, युवकांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम तसेच समाजजागृतीपर उपक्रम राबवून जयंती उत्सवाला व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.या वर्षीची शोभायात्रा विशेष आकर्षण ठरणार असून विविध पथकांच्या सहभागातून ती अधिक लक्षवेधी आणि शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येईल, असेही आ. संजय गायकवाड यांनी सांगितले. महानाट्याच्या माध्यमातून संभाजी महाराजांचे जीवनकार्य आणि शौर्यगाथा जनतेसमोर प्रभावीपणे मांडली जाणार आहे.
नियोजन बैठकीचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी घटना ठरली. एका मुस्लिम समाजातील व्यक्तीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवासाठी तब्बल सात लाख रुपयांचे ‘शिवदान’ देत सामाजिक बंधुभावाचे उदाहरण घालून दिले. या योगदानाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.या प्रसंगी आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव केला. संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर धर्मरक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान हे संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा उल्लेख करत, त्यांच्या आदर्शावर संभाजी महाराजांनी स्वराज्य अधिक मजबूत केल्याचेही त्यांनी सांगितले.या नियोजन बैठकीस शिवजयंतीचे माजी अध्यक्ष, भीम जयंतीचे पदाधिकारी, संभाजी महाराज जयंती समितीचे माजी अध्यक्ष, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, शिवप्रेमी नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने आगामी जयंती उत्सव ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.