पुणे
Maharashtra weather महाराष्ट्रात मागील चार दिवसांपासून हवामानात मोठे बदल पाहायला मिळत असून काही भागांत जोरदार अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट अशी विसंगत स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी अलर्ट जारी केला आहे.
मराठवाड्यात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून परभणी, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई आणि आसपासच्या काही भागांमध्ये रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे.
दुसरीकडे कोकण Maharashtra weather आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती येथे ४४.४ अंश सेल्सिअस इतके उच्च तापमान नोंदवले गेले असून अकोला शहरात पुन्हा एकदा तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. अकोला ‘हॉट सिटी’ म्हणून ओळखले जात असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांमध्ये उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. नंदुरबारमध्येही ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.रायगड, ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी या भागांतही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.दरम्यान, पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येथे आधीच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.या सतत बदलणाऱ्या हवामानाचा शेती पिकांवरही मोठा परिणाम होत असून अवकाळी पावसामुळे काही भागांत नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामानातील या अनिश्चिततेमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.