डॉ. एस. एम. कानडजे अमृत महोत्सवी गौरव विशेषांक प्रकाशन सोहळा
बुुलढाणा,
'amrut mahotsavi gaurav visheshank' साहित्य व समाज आपण स्वतंत्र करू शकत नाही. साहित्य हा समाजाचा आरसा आहे. साहित्यातच जिवनाचे प्रतिबिंब सामावलेले असते. साहित्य दिशादर्शक आहे. साहित्य आपल्या जगण्याला बळ देत असत. आपल्या जगण्याच्या वाटा या कुंठीत झाल्या असतात तेव्हा साहित्य भानावर आणण्याचे काम करीत असते. समाजाचा विवेक जागविण्याचे काम साहित्य करीत असते. समष्टीला जोडून घेण्याचे काम साहित्य करीत असते. असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. आसाराम लोमटे यांनी केले.
डॉ. एस. एम. कानडजे यांच्या अमृत महोत्सवी गौरव विशेषांक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित साहित्य, समाज आणि संवेदनशिलता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. दि. २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता येथील शिवाजी विद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून कांदबरीकार रविंद्र इंगळे उत्राटकर, संपादक डॉ. नितीन रिंढे, सत्कारमूर्ती डॉ. एस. एम. कानडजे, हभप डॉ. विकास बाहेकर, डॉ. कि. वा. वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा गौरव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करतांना डॉ. बाहेकर म्हणाले की, डॉ. एस. एम. कानडजे हे आमचे गुरु असून गुरुच्या ऋणाईत राहाण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कानडजे सरांचा खरा जिवनपट समाजासमोर यावा व त्यांनी केलेल्या कार्यातून नवोदितांना प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.
डॉ. लोमटे पूढे म्हणाले की, साहित्याचे जिवनदर्शन घडविणे एवढेच काम नाही तर समाजात काही मुल्य रुजवावी लागतात. आदर्श मुल्यांचे आचरण समाजातून हद्दपार होऊ नये यासाठी समाजातील मुल्य व्यवस्थेला निर्धारीत करण्याचे काम साहित्य करत असते. एक आंतरिक गोष्ट म्हणजे आपण व्यक्ती आहोत. आजच्या स्थितीत आपण कुटुंबातील व्यक्ती जवळ असलो तरी मोबाईलवरून संवाद साधतो. जसे आपण वेगवेगळ्या बेटावर स्वतंत्र राहत आहोत. हे समष्टीला जोडून घेण्याचे कामही साहित्य करीत असते. विविध लेखकांच्या पुस्तकातील दाखले देत त्यांनी साहित्य, समाज, व संवेदनशीलता हा विषय सहजपणे मांडण्याचा प्रयत्न केला.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात रविंद्र इंगळे म्हणाले की, डॉ. एस. एम. कानडजे यांच्या यशस्वी जिवनाची कारकिर्द न्याहाळतांना लक्षात येते की सरांमध्ये चिकाटी, हातोटी आणि सचोटी हे गुण त्यांच्यामध्ये भरभरून दिसतात. या गुणांमुळेच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील विविध पदे भूषविली आहेत. साहित्य क्षेत्रात नवोदितांना मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी प्रामाणिकपणे केल्याने त्यांचे अनेक विद्यार्थी आचार्य पदवीने सन्मानित आहे. याप्रसंगी प्रा. डॉ. एस. एम. कानडजे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन प्रा. विनोद देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. कि.वा. वाघ यांनी मानले या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.