महर्षी काळाच्या पडद्याआड...

Dr.Jayant Narlikar-demise विज्ञानक्षेत्रात हिमालयाच्या उंचीचे काम

    दिनांक :20-May-2025
Total Views |
श्रद्धांजली
निरंजन अभ्यंकर, माजी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, आयुका
 
 
Dr.Jayant Narlikar-demise एक मे 1989 मध्ये मी ‘आयुका’मध्ये कामाला सुरुवात केली. तेव्हापासूनच म्हणजेच गेली 36 वर्षे डॉ. जयंत नारळीकर यांचा सहवास लाभला. या प्रदीर्घ काळात एकत्र काम करताना अनेक आठवणींचा संचय तयार झाला. सरांच्या निधनाने त्या ताज्या झाल्या असून त्यांचे नसणे ही अत्यंत दुखद बाब आहे. सरांचे नाव निघताच कार्यरत असताना आणि निवृत्तीनंतरही सततचा त्यांचा उत्साही वावर डोळ्यासमोर येतो. थकल्यानंतरचा अलिकडचा काळ वगळता ते अधूनमधून संस्थेत येत असत. अगदी गेल्या वर्षीपर्यंत मी ‘आयुका’मध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांना भेटण्याची, चार शब्द बोलण्याची संधी मिळायची. प्रदीर्घ सहवासात या व्यक्तिमत्त्वाने मी पुरता भारावलो होतो. शास्त्र, गणित हे विषय आणि मराठी-इंग्रजी-हिंदी आणि संस्कृतवरील त्यांचे प्रभुत्व विलक्षण होते. नंतर त्यांनी फ्रेंच भाषेचाही अभ्यास केला होता. असा हा ज्ञानी, विद्वान शास्त्रज्ञ नानाविध गुणांनी संपन्न होता.
 
 
 
Dr.Jayant Narlikar-demise
 (फोटो इंटरनेटवरून साभार)
 
Dr.Jayant Narlikar-demise वेळ पाळण्यात त्यांचा हात धरणारे क्वचितच कोणी असेल. ते आले की घड्याळ लावून घ्यावे, अशी ख्यातीच होती. केवळ ऑफिसमध्येच नव्हे तर, कोणत्याही समारंभ वा अन्य कार्यक्रमालाही ते दिलेल्या वेळेपूर्वी दहा मिनिटे हजर असत. डॉ. नारळीकर यांना कोणतेही काम शंभर टक्के अचूक लागायचे. स्वत:चे योगदान शंभर टक्के असल्यामुळे स्वाभाविकच समोरच्या व्यक्तीकडूनही त्यांची तितक्याच अचूकतेची अपेक्षा असायची. ‘आयुका’चे संचालकपद स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या संशोधन कामाबरोबरच संयोजन आणि आर्थिक व्यवहार, हिशेब तपासणी यामध्येही जातीने लक्ष घातले. त्याविषयी जाणून घेतले. ते स्वत: उत्तम संयोजक होते. स्वाभाविकच त्यांच्याकडून आम्हाला यातील नेमकेपणा शिकायला मिळाला. अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व असणारे जयंत नारळीकर सकारात्मक आणि सहज संभाषणाने, संवादाने समोरच्या व्यक्तीवरील तणाव अगदी सहज दूर करायचे. ‘आयुका’मध्ये आलो तेव्हा मी अवघ्या 25 वर्षांचा होतो. तेव्हा त्यांच्याविषयी असणारी आदरयुक्त भीती अगदी शेवटपर्यंत होतीच.
 
 
 
Dr.Jayant Narlikar-demise पण सरांनी नेहमीच आम्हाला समजून घेण्याची भूमिका घेतली. हातून काही चूक झाली तरी त्यांना मोकळेपणाने सांगता येईल, चुकीची कबुली देता येईल इतकी सहजता त्यांनी आपल्या कनिष्ठ सहकाèयांबरोबरील नात्यामध्ये ठेवली. चूक कशी दुरुस्त करायची ते आपण बघू, हे त्यांचे समजुतीचे वाक्य आजही स्मरते. सुदैवाने तशी वेळ आली नाही, पण हा विश्वास खूप महत्त्वाचा होता. ‘आयुका’मध्ये मी अकाऊंटंट म्हणून रुजू झालो. सुरुवातीला नारळीकर सर ज्येष्ठ लेखापालांकडून माझे काम तपासून घेत असत. विशेषत: आयकराशी संबंधित कामाची तपासणी व्हायची. पण तपासणीत एकही चूक आढळायची नाही, तेव्हा ते मोकळेपणाने पाठीवर हात टाकायचे आणि काम अचूक केल्याबद्दल कौतुकाचे शब्द बोलायचे. तेव्हापासून आमची त्यांच्यापुढे उभी राहण्याची भीती कमी झाली, असे मी म्हणेन. सरांनी विज्ञानक्षेत्रात हिमालयाच्या उंचीचे काम करुन ठेवले आहेच; खेरीज ते विविध भाषांमध्ये मांडले आहे.
 
 
 
Dr.Jayant Narlikar-demise ‘पुलं’च्या देणगीतून त्यांनी ‘सायन्स मुक्तांगण विज्ञान शोधिका’ स्थापन केली तेव्हा त्याचा उद्देशच लहान वयापासून मुलामुलींच्या मनात विज्ञानाची आसक्ती निर्माण करणे आणि पुढे त्यांना शास्त्रशाखेत कार्यरत होण्यास मदत करणे, हा होता. मुलांची विज्ञानविषयक संशोधनात रुची वाढवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. अर्थातच यासाठी त्यांचे सहजसोपे लेखन कामी आले. यातून भारतालाच नव्हे तर समस्त विश्वाला प्रेरणा मिळाली. त्यांनी लावलेले शोध, मांडलेली सूत्रे, वैज्ञानिक गोष्टींची मांडणी जगाला अचंबित करणारी आहे. म्हणूनच जागतिक पातळीवर घेतल्या जाणाऱ्या अनेक कार्यशाळांमध्ये ‘कॉस्मोलॉजी’ या विषयावर त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याचा संदर्भ घेऊन अनेक व्याख्याने, चर्चासत्रे सुरू असतात. युट्युबवरही त्यांची अनेक व्याख्याने उपलब्ध आहेत. विज्ञानासारख्या किचकट क्षेत्रामध्ये हरवून जाणारे सर विनोदी प्रवृत्तीचे होते. ते कधी कधी असे एखादे वाक्य बोलायचे की, पुढचा बराच काळ चेहऱ्या वरील हास्याची लकेर पुसली जायची नाही. त्याचबरोबर ते हजरजबाबी होते. संस्कृत भाषेचा उत्तम अभ्यास, ज्ञान असल्यामुळे वेळ पडेल तेव्हा ते काही वचने आणि अर्थ स्पष्टीकरणासाठी सांगायचे.
 
 
 
Dr.Jayant Narlikar-demise इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. म्हणूनच शास्त्राबरोबरीने त्यांच्या भाषेवरील प्रभुत्वाचे अपार कौतुक वाटायचे. अचूक शब्दाचा वापर ही त्यांची खासियत होती. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असणे अगदी स्वाभाविक आहे. एक आठवण सांगतो. तो दिवाळीतील एक दिवस होता. पण सुटीच्या दिवशी एका रिपोर्टचे काम करण्यासाठी त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावले होते. नऊ वाजता बोलावले असताना मी पावणे नऊच्या सुमारात ऑफिसमध्ये पोहोचलो आणि लेजर काढून हाताने कामाला सुरुवात केली. पाठोपाठ नऊच्या आधीच सर आले आणि लांबूनच मला काम करताना बघून गालात हसले. कदाचित तेथेच मी जिंकलो होतो. नंतर दुसऱ्या कामासाठी ते निघून गेले. काम संपवल्यानंतर मी काहीशा भीतीनेच घरी फोन करून त्यांना काम पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यावर केलेले काम तेथेच ठेवून घरी जाण्यास त्यांनी मला सांगितले. त्यानंतर सुटी संपल्यानंतरच्या दिवशी वेळेआधीच ते आले. टेबलवरील मी ठेवलेला पेपर तपासला, काही सूचना केल्या आणि ठीक नऊ वाजता मी खाली मान घालून काम करत असताना समोर उभे राहत मला सुधारित काम पाठवून देण्याची सूचना दिली. यावेळी सुटीच्या दिवशी काम केल्याबद्दल कौतुक करायला ते विसरले नाहीत.
 
 
 
Dr.Jayant Narlikar-demise आणखी एक आठवण म्हणजे, मी केलेले एक काम त्यांना पसंत नव्हते. इतरांनी चुकीच्या गोष्टी सांगितल्यामुळे मी केलेली आकडेमोड त्यांना चुकीची वाटत होती. पण काम अचूक असल्याच्या भूमिकेवर मीही ठाम होतो. असे असताना सरांनी मला थेट आयकर विभागाच्या अधिकाèयांकडे जाऊन केलेले काम योग्य असल्याची खातरजमा करण्यास सांगितले. खरे तर तसे होणे शक्य नव्हते. पण तरीही सरांच्या आग्रहाखातर मी तेथे गेलो. अपेक्षेप्रमाणे तेथे उत्तर मिळाले नाही. येऊन ही बाब मी सरांना सांगितली. त्यानंतर त्यांनी तीन-चार लेखापालांकडून काम तपासून घेतले. खेरीज दिल्लीला गेले असता तेथील विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरकडूनही हे काम तपासून घेतले. तेव्हा त्यांनीही काम अचूक असल्याचा निर्वाळा दिला आणि तुम्हाला त्या मानाने नाममात्र आयकर भरावा लागतोय, हे स्पष्ट केले. इतके सगळे झाल्यानंतर परत आल्यानंतर सर मला भेटले, पाठीवर हात ठेवला आणि केलेले काम बरोबर होते, असे स्पष्टपणे सांगितले. तेव्हापासून त्यांचा माझ्या कामावरील विश्वास वाढला.
 
 
 
Dr.Jayant Narlikar-demise अकाऊंट ऑफिसर म्हणून अनेक वर्षे काम केल्यानंतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून पुढील अकरा वर्षे मी केलेले काम त्यांच्या पसंतीला उतरले. मी निवृत्त झाल्यानंतर निरोप समारंभास ते आवर्जून आले होते. तेव्हा कामातील अचूकतेबद्दल, नेटकेपणाबद्दल त्यांनी प्रशंसा केली होती. प्रत्येक संस्थांमध्ये संताजी-धनाजी असतात. येथे तुम्ही तसेच आहात, असे त्यांच्या तोंडून ऐकताच खरे तर मी भावविवश झालो होतो. काय बोलावे ते कळले नव्हते. पण ही सरांकडून मिळालेली मोठी पोचपावतीच होती. 25 व्या वर्षी प्रथम भेटीमध्ये पाहिले तेव्हा डॉक्टर झब्बा-पायजमा घालून, हातातील पिशवीमध्ये फणस सांभाळत येताना पाहायला मिळाले होते. ते तेव्हाही साधे होते आणि आतापर्यंत साधेच होते. वागण्या-बोलण्यातला साधेपणा त्यांनी तितक्याच सहजतेने जपला होता. त्यांची ती छबी, अदबीने बोलण्याची सवय कधीच विस्मरणात जाणार नाही. त्यांच्या रूपाने दररोज मला जणू सरस्वतीचेच दर्शन व्हायचे. आता ते होणार नाही. अनंतात विलीन झालेले सर, आमचे महर्षी स्मृतींमध्ये मात्र कायम होते तसेच राहतील.
 
(लेखक ‘आयुका’ या संस्थेमध्ये माजी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना डॉ. नारळीकर यांचा मोठा सहवास लाभला.)