FARMERS BILL आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खताच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. शेती उत्पादनासाठी रासायनिक खत अनिवार्य असल्याने शेतकर्यांच्या व्यवहारात रासायनिक खताच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात गेल्या काही वर्षांत सततची वाढच होत असल्याने शेतकर्यांचे अर्थशास्त्र बिघडत असल्याची स्थिती आहे. तालुक्यासह जिल्ह्यात खरिपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खताची खरेदी होते. शिवाय उन्हाळी धान व ऊसासाठी बेसळ डोस देणे आवश्यक असल्याने खताची आतापासूनच मागणी होत आहे. मात्र मिश्रखते, सुपर, पोटॅश यांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकर्यांना अधिकचा आर्थिक भार पडणार आहे. धानाच्या शेतीसाठी एकरी तीन बॅग खताची आवश्यकता आहे. तर ऊस पिकासाठी किमान आठ ते दहा पोते खत लागते. डिझेलची दरवाढ झाल्याने ट्रॅक्टरमार्फत होणारी आंतरमशागतीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढणार आहे.